12 ते 26 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

0
15

वाशिम, दि. 11 एप्रिल (प्रतिनिधी) :

जिल्हयात 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,15 एप्रिल रोजी महावीर जयंती व 16 एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सव जिल्हयात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. तसेच सद्यस्थितीत मुस्लीम धर्मियांचा रमजान महिना सुरु आहे.

जिल्हा जातीयदृष्टया संवेदनशील असून नजिकच्या काळात शेजारच्या अकोला,अमरावती व यवतमाळ या जिल्हयात घडलेल्या जातीय घटनेच्या प्रतिक्रीया आगामी काळात जिल्हयात उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सद्यस्थितीत राज्यात एस.टी. महामंडळ कर्मचारी यांचे महामंडळास राज्य शासनात समावेश करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरु आहे.तसेच पेट्रोल, डिझेल दरवाढ, एमएसपी कायदा लागू करणे, शेतकरी कर्जमाफी,पीक कर्ज मंजूरी, दुध दरवाढ,वाढती महागाई,वीजबिल माफी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच इतर विविध मागण्यासंदर्भात विरोधी पक्षाच्या तसेच शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्हा जातीयदृष्टया आणि सण,उत्सवाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे.जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे सोयीचे व्हावे.यासाठी 12 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिले आहे.

मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) च्या प्रतिबंधात्मक आदेशाने सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावास एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय अधिकारी- कर्मचारी किंवा विवाह,अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here