यवतमाळ दिनांक 26 मे ( प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे कृषी विभागाला निर्देश
अडचणीच्या गावांमध्ये वेळेपुर्वीच खत साठा उपलब्ध ठेवा
भरारी पथकाने सक्रीय राहावे
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा
विहित मुदतीत जिल्ह्याला खत साठा उपलब्ध न केल्यास गुन्हे दाखल करा
शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीची पावती जपून ठेवावी
जिल्ह्यात सोयाबिन व कापूस बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतांना बोगस व प्रतिबंधीत बियाण्यांची तसेच खतांची चुकिच्या पद्धतीने आयात होत असल्याचे आढळून आल्यास किंवा शेतकऱ्यांची फसवणूक तथा अडवणूक करण्याचे प्रकार आढळल्यास संबंधीतांवर फौजदारी गुन्हे नोंदवून कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिले.
खते, बियाणे व किटकनाशके या कृषी निविष्ठांच्या सनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळकपर, जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, गुवणवत्ता नियंत्रण अधिकारी शिवा जाधव, खते व बियाणे कंपण्याचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी खत व बियाण्यांच्या हेराफेरी संदर्भात भरारी पथकाने सक्रिय राहत गोपणीय माहिती मिळवून कारवाई करण्याचे तसेच जिल्ह्याच्या सिमेवर दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीची पावती जपून ठेवावी. बियाणे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना बियाण्यांची विक्री करतांना पावती देणे बंधनकारक आहे. तसेच त्यांनी छापील किंमतीपेक्षा कमीत कमी किंमतीत शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून द्यावे व बियाण्यांची काळजी घेण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शेतकऱ्यांना देण्याचेही त्यांनी सांगितले.
यवतमाळ जिल्ह्याकरिता नांदेड खत रॅकवर अलॉट केलेला खत साठा आर.सी.एफ. कंपनीने अद्याप उचल केला नाही. नांदेड रॅकवरून जिल्ह्याचा खतसाठा विहित मुदतीत जिल्ह्याला उपलब्ध न केल्याप्रकरणी आर.सी.एफ. खत कंपनीच्या प्रतिनिधींवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. सर्व खत कंपन्यांनी विशेषत: आर.सि.एफ. व इफ्को कंपन्यांनी जिल्ह्याकरिता विहित केलेला खत साठा पुढील आठ दिवसात उपलब्ध करून द्यावा.
कोणत्याही परिस्थितीत खतासाठी शेतकऱ्यांनी दुकानासमोर रांगा लावल्या नाही पाहिजे अशी ताकीदही जिल्हाधिकारी यांनी खत कंपन्यांच्या प्रतिनिधींना दिली. पावसाळ्यामुळे तसेच वाहतुकीमुळे अडचण येणाऱ्या गावांमध्ये विहित वेळेपुर्वी खत साठा उपलब्ध ठेवण्याची दक्षता घेण्याचेही त्यांनी सांगितले.






