पोकरा योजनेतील विहिरी व जलसंधारणाची कामे पावसाळ्यापुर्वी पुर्ण करा : जिल्हाधिकारी येडगे

0
7

यवतमाळ दिनांक 19 एप्रिल ( प्रतिनिधी) :-

शेतकऱ्यांपर्यंत चुकीचे बियाणे व निविष्ठा जावून त्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

 

 

जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजनेअंतर्गत विहिरी बाधकामाची तसेच जलसंधारणातील कामांच्या संथगतीबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नाराजी व्यक्त करून ही कामे येत्या दोन दिवसात सुरू करून पावसाळा सुरू होण्यापुर्वी पुर्ण करण्याचे निर्देश कृषी अधिकाऱ्यांना दिले. तसेच शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट व महिला बचत गट यांचेकरिता अवजारे बँक, गोडाऊन, अन्न प्रक्रिया केंद्र, औषधी वनस्पती प्रक्रीया केंद्र, दाल मिल इत्यादी साठी शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त अर्ज मागविण्याचे व आतापर्यंत प्राप्त झालेले अर्ज तातडीने निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पोकरा योजना व बियाणे व खताबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभीये, नाबार्ड चे जिल्हा व्यवस्थापक श्री पेन्दाम, जिल्हा पणन अधिकारी अर्चना माळवे प्रामुख्याने उपस्थित होते.

पोकरा योजनेंतर्गत नोंदणी केलेले सर्व शेतकरी यांना ठिंबक व तुषार सिंचनाची सुविधा तसेच फळबाग व रेशीम शेतीची कामे मिळण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी त्यांचेशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांचेकडून मागणी अर्ज घ्यावे व त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी सकारात्मकतेने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रत्येक गावात यावर्षी किमान एक तरी रेशीम शेतीचे उद्दिष्ट ठेवावे जेणेकरून त्यांना होणारा लाभ पाहून पुढील वर्षी इतरही शेतकरी रेशीम शेतीकडे वळतील असे त्यांनी सांगितले.

बियाणे व खताबाबत आढावा घेतांना कृषी विभागाने वेळोवेळी बियाणे व खतांच्या तपासण्या कराव्या व शेतकऱ्यांपर्यंत चुकीचे बियाणे व निविष्ठा जावून त्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या.

शेतकऱ्यांकडे सोयाबीन लागवडीसाठी घरचे बियाणे उपलब्ध राहतील याबाबत लक्ष देण्याचे व त्या बियाण्यांची चाचणी करून घेण्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात ग्राम कृषी समिती स्थापन झाली आहे का याबाबत तपासणी करणे, 24 एप्रिल ते 1 मे दरम्यान पीक कर्ज मेळावे आयोजित करणे, शेतकऱ्यांना नॅनो युरियाचे फायदे सांगून ते वापरासाठी जनजागृती करणे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जैविक खताचा वापर करण्यासाठी प्रोत्साहीत करणे, त्यांना पेरणीसाठी मार्गदर्शन करणे व त्यासोबतच नरेगा योजनेमध्ये फळबाग व रेशीमची जास्तीत जास्त पिके घेण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीला सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here