चंद्रपूर दिनांक 9 डिसेंबर (प्रतिनिधी)
शहराच्या रमाबाईनगर भागात महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.झरपट नदीच्या काठावर ३५ वर्षीय महिलेचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळला. मना मनोज कोठार असे मयत महिलेचे नाव आहे.
ही थरारक घटना सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. मात्र अवघ्या काही तासातच रामनगर पोलिसांनी या घटनेचा छडा लावत दोघांनाही अटक केली. यात एक आरोपी अल्पवयीन असून दुसऱ्याचे नाव अमरजित शशीकपूर चव्हाण (२०)असे आहे. या महिलेचे आरोपीच्या वडिलांसोबत अफेअर होतं. याचाच राग मनात ठेवून आरोपीने हे कृत्य केलं आहे. या घटनेनंतर दोघेही भावंडे फरार झाली.
मना कोठार हिला तीन मुले आहेत. मात्र, गेल्या वर्षभरापासून ती पती व मुलांपासून विभक्त राहते. तिचा पती बाहेर राज्यात आपल्या मुलांसोबत राहतो. अशातच तिची ओळख शशीकपूर चव्हाण यांच्याशी झाली. दोघांत प्रेम जुळले. यातून त्यांच्यात जवळीक वाढली. आपल्या आई-वडिलांच्या मध्ये परस्त्री आल्याची बाब चव्हाण यांच्या मुलांना खटकली. यावरून घरातील घरातील वातावरण बिघडले. तेव्हापासूनच या महिलेचा काटा काढण्याचा कट शशीकपूर चव्हाण यांचा मुलगा अमरजित व त्याचा अल्पवयीन चुलत भाऊ यांनी रचला. हे दोघेही मनावर पाळत ठेवत होते.
सकाळी मना ही झरपट नदीच्या काठावर प्रात:विधीसाठी गेली होती. अशातच मागावर असलेल्या चव्हाण बंधूंनी तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. ती जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. यानंतर हे दोघे भाऊ घटनास्थळावरून पसार झाले. काही वेळाने परिसरातील नागरिकांना मनाचा मृतदेह दिसताच याची माहिती रामनगर पोलिसांना दिली.
पोलीस तपासात चव्हाण नावाच्या व्यक्तीसोबत या महिलेचे प्रेमसंबंध असल्याची बाब पुढे येताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. चव्हाण यांची मुले घरातून बेपत्ता असल्याचे लक्षात येताच संशय बळावला. अखेर गतीने शोध घेऊन अमरजित चव्हाण व त्याच्या अल्पवयीन चुलत भावाला ताब्यात घेतले. पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गोपानी करीत आहेत.






