वाशिम दिनांक 19 मई (प्रतिनिधी) :
विशेष सहाय्य विभागाच्या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात येते. यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना या योजनांचा समावेश आहे.
या योजनांचा लाभ घेणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २० ऑगस्ट २०१९ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे माहे,एप्रील ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला सादर करण्याबाबत नमुद केले आहे.
त्यानुसार वरील योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व संबंधीत पात्र लाभार्थ्यांनी एप्रील २०२२ ते जून २०२२ या कालावधीत उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक असून सर्व संबंधीत पात्र लाभार्थ्यांनी आपला उत्पन्नाचा दाखला संजय गांधी योजना शाखा, तहसिल कार्यालय, वाशिम येथे तात्काळ सादर करावा. अन्यथा वरील योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य बंद करण्यात येईल.
ज्या तारखेला आपण उत्पन्नाचा दाखला सादर केला त्या तारखेपासूनच लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य सुरु करण्यात येईल. असे तहसिलदार वाशिम यांनी कळविले आहे.





