यवतमाळ दिनांक 30 एप्रिल (प्रतिनिधी) :-
कृषी विभागामार्फत सन 2017,2018 व 2019 या तीन वर्षात कृषी क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी अधिकारी यांचा सत्कार व राज्य पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 2 मे रोजी नाशिक येथे करण्यात आलेले आहे. यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांचा सत्कार सुद्धा नाशिक येथे होणार आहे.
यवतमाळ तालुक्यातील शिवनी येथील प्रभाकर विठ्ठल ठाकरे यांची सन 2017 या वर्षाकरिता कृषी भूषण सेंद्रीय शेती या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. सन 2019 चे पुरस्कार अंतर्गत गाजीपूर ता. दारव्हा येथील जगदीश हरिदास चव्हाण यांची निवड उद्यान पंडित या पुरस्कारासाठी झालेली आहे.
तसेच 2019 चे शेतीनिष्ठ शेतकरी आदिवासी गट या पुरस्काराकरिता खैरगाव (दे.) ता. पांढरकवडा येथील महेंद्र दौलत नैताम यांची निवड झालेली आहे. या तीन शेतकऱ्यांचा सत्कार नाशीक येथे करण्यात येणार आहे.






