राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी प्रयासवन येथे केले वृक्षारोपण

0
11

यवतमाळ दि.25 (प्रतिनिधी) : कोणत्याही ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक आहे. निसर्ग संवर्धानासाठी प्रयासवनची करण्यात आलेली उभारणी म्हणजे ही अनेक वर्षाची कठीण साधनाच आहे. असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

आज 25 नोव्हेंबर रोजी यवतमाळजवळील गोधणी रोड येथील वन विभागाच्या जागेत प्रयास या सेवाभावी संस्थेच्या पुढाकारातून अनेक वृक्षांची लागवड करून जोपासना करण्यात येत आहे. याठिकाणी राज्यपाल  कोश्यारी यांनी वृक्षारोपण केले. यावेळी ते बोलत होते.

आमदार मदन येरावार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, प्रयासवनचे अध्यक्ष डॉ. विजय कावलकर, उपवनसंरक्षक किशोर वाबळे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

राज्यपाल पुढे म्हणाले, प्रयासवन उभारणीत लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी मदत करीत आहे. त्यांचे अधिकाधिक सहकार्य घेवून या ठिकाणी पुढील पाच ते सहा वर्षात चांगले वन तयार झाल्याचे दिसेल व प्रत्येक व्यक्तीला प्रयासवन येथे येण्याची आवड स्वत:हून निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.

शासनाच्या त्रिपक्षीय करारानुसार वन विभागाच्या 25 एकर जागेवर प्रयास या संस्थेमार्फत आतापर्यंत आठ हजार चारशे वृक्ष लागवड करण्यात आली असून येथे वृक्ष संवर्धनातून प्रयासवन साकारण्यात आले आहे. याठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते बेल या वृक्षाची लागवड करून करण्यात आला. तसेच पंचवटी भागाचे लोकार्पण व जैवीक खत निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ देखील राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते फलकाचे अनावनरण करून यावेळी करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here