यवतमाळ दि. 15 सप्टेंबर : जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी मुंबई पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये शस्त्रबंदी व जमावबंदी प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आला असून पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. सदर आदेश दि. 16 सप्टेंबर रात्री 12 वाजेपासून तर 30 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील.
या आदेशान्वये जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा कोणत्याही व्यक्तीस, शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, रिव्हॉल्व्हर, सुरे, काठया, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू, कोणताही क्षार, द्रव्ये पदार्थ, दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, जमा करून ठेवता येणार नाहीत किंवा जवळ बाळगता येणार नाही किंवा तयार करता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक किंवा जाहीरपणे असभ्य वर्तन करता येणार नाही.
सदर आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी तसेच विवाह, अंत्ययात्रा, सक्षम अधिकारी यांनी विशेष परवानगी दिलेले मिरवणूक व कार्यक्रम यांना लागू राहणार नाही.






