जिल्हाधिकाऱ्यांकडून पीक नुकसानीची पाहणी , शेतकऱ्यांशी साधला संवाद

0
15

वाशिम, दि. 30 : मागील काही दिवसात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीने सोयाबीन, तूर पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. हे 29 सप्टेंबर रोजी वाशिम तालुक्यातील मोहजा आणि रिसोड तालुक्यातील रिठद, आसेगांव (पेन), वरुड (तोफा) आणि बेलखेड शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार तालुका कृषि अधिकारी अनिल कंकाळ व चंद्रकांत उलेमाले प्रामुख्याने उपस्थित होते.

वाशिम तालुक्यातील मोहजा शिवारातील अरुण कळणे आणि देविदास पडघान यांच्या शेताला भेट देवून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. पिक विमा काढला का याबाबत संबंधित शेतकऱ्यांना विचारणा केली. झालेल्या पिक नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी रिलायन्स कंपनीच्या तालुका प्रतिनिधीशी संपर्क साधावा.असे जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सुचविले, यावेळी रिलायन्स विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी, तलाठी राजेश बोरकर, शेतकरी संजय सरनाईक, श्रीराम कळणे, शालीक कळणे, उत्तम कळणे व अशोक सरनाईक यांच्यासह अन्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

त्यानंतर रिसोड तालुक्यातील रिठद, आसेगांव (पेन) वरुड (तोफा) व बेलखेड येथील शिवारातील नुकसान झालेल्या शेतीतील पिकांची सुध्दा जिल्हाधिकारी षन्मुगराजन यांनी पाहणी करुन झालेल्या नुकसानीची संबंधित शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीन पिकांची पेरणी पारंपारीक पध्दतीने न करता बीबीएफ आणि टोकन पध्दतीने केल्याचे सांगितले. त्यामुळे बियाण्याच्या खर्च कमी आल्याची तसेच पिक विमा काढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. रिठद येथील गजानन शर्मा, गजानन बोरकर, आसेगांव (पेन) येथील नंदा खानझोडे, जयकिसन आरु व सिंधुबाई नाईकवाडे याच्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करतांना कृषि सहायक अरुण इंगोले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here