यवतमाळ दिनांक 9 जून ( प्रतिनिधी)
परिस्थितीमुळे व आजारपणामुळे, पैसे कमावणे व त्यातुन उदरनिर्वाह करणे, मोठ्या व्यक्तीद्वारे बालकांचा भिक्षा मागण्याकरीता उपयोग करणे, अशा अनेक बाबीमुळे बालकांचा बाल भिक्षेकरी म्हणुन उपयोग केला जातो व त्यामुळे बालकांचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
ही गंभीर बाब विचारात घेता यवतमाळ तालुक्यात तालुक्यातील बाल भिक्षेकरी बालकांचा शोध घेवून त्यांचे पुनर्वसन करण्याकरीता तालुका बाल संरक्षण समिती यांची सभा तहसिलदार कुणाल झाल्टे यांच्या अध्यक्षतेखाली 6 जून रोजी घेण्यात आली.
यवतमाळ जिल्ह्यात बाल भिक्षेकरी बालकांचा शोध घेवून त्यांचे पुनर्वसन करण्याकरीता एक विशेष मोहीम दिनांक १ जुन ते ८ जुन पर्यंत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हाधिकारी यांचे निर्देशानुसार राबविण्यात येत आहे.
याअंतर्गत बाल भिक्षेकरी बालकांचा शोध घेवून त्यांचे पुनर्वसन करण्याकरीता तालुक्यात तीन पथके तयार करण्यात आलेली आहे. त्यामध्ये एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी, शिक्षण विभाग, तालुका संरक्षण अधिकारी, पोलीस स्टेशन, तालुका आरोग्य अधिकारी, तहसिल कार्यालय यवतमाळ, इत्यादी कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
सदर पथकाद्वारे तसेच सर्व विभागाचा समन्वय साधुन तालुक्यातील बाल भिक्षेकरी बालकांचा शोध घेवून त्यांचे पुनर्वसन करण्याची मोहीम सुरू आहे. तरी यवतमाळ तालुक्यामध्ये कुठेही भिक्षा मागणारी १८ वर्षाखालील मुले/मुली आढळल्यास तात्काळ २४ तास कार्यरत असलेला टोल फ्री क्रमांक चाईल्ड लाईन १०९८ वर संपर्क करावा, असे आवाहन तालुका बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी नागरिकांना केले आहे.






