पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद नव्हे तर मुंबई-नागपूर असायला हवी होती : मुख्यमंत्री ठाकरे

0
20

महाराष्ट्र दिनांक 3 एप्रिल (प्रतिनिधी)

केंद्र सरकार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी आग्रही आहे. मात्र, देशातील पहिली बुलेट ट्रेन सुरु करायचीच होती तर ती मुंबई-अहमदाबाद नव्हे तर मुंबई-नागपूर असायला हवी होती. जेणेकरून राज्याची राजधानी आणि उपराजधानी जोडली गेली असती. त्याचा फायदा महाराष्ट्राला झाला असता.

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन (Bullet Train) ही राज्यासाठी तितकीशी फायदेशीर नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. ते  मुंबईतील मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेन प्रकल्प आणि मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरून केंद्रातील भाजप सरकारला चिमटे काढले. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकार आग्रही आहे. त्यासाठी केंद्र सरकार मुंबईच्या बीकेसी परिसरातील लाखमोलाची जमीन मागत आहे. ही जागा आपण आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रासाठी राखू ठेवली होती.

केंद्र सरकार ही जमीन घेत असेल तर मग मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडसाठी कांजूरमार्गमध्ये ओसाड पडलेली जमीन का देत नाही? मुंबईविषयी केंद्र सरकारला इतकं प्रेम आहे तर मग ही जमीन कारशेडसाठी का दिली नाही? ही जागा मिळाल्यास भविष्यात आपण मेट्रोचा विस्तार अंबरनाथपर्यंत करू शकतो. याशिवाय, पंपिंग स्टेशन आणि धारावीच्या पुनर्विकासासाठीही राज्य सरकार जागा मागत आहे, त्यासाठीही केंद्र सरकार जमीन का देत नाही, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत उद्धव ठाकरे यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

तसेच भाजप सरकारच्या काळात सुरु झालेले विकासाचे प्रकल्प आम्ही अडवून ठेवले नाहीत. तुम्ही सुरुवात केलेले प्रकल्प आम्ही पुढे नेले, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here