वाशिम, दि. 27(प्रतिनिधि): शिक्षण हा बालकांचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे कोणतेही मुल हे शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. एस.पी. शिंदे यांनी केले.
वाशिम तालुक्यातील वांगी येथे आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबीरात अध्यक्षस्थानावरुन न्या. शिंदे बोलत होते. यावेळी न्या. एम.एस. पदवाड, ॲड. शुभम लुंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. न्या. शिंदे पुढे म्हणाले, आई-वडिलांनी मुलांच्या नावावर संपत्ती करुन देतांना त्यांच्या स्वत:च्या उदरनिर्वाहाची तरतुद करावी असे सांगितले.
न्या. पदवाड व ॲड. लुंगे यांनी ज्येष्ठ नागरीकांचे अधिकार आणि प्रदूषणमुक्त जीवन जगण्याचा अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला वांगी येथील ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ग्रामसेविका श्रीमती. इढोळे तसेच ग्रामस्थ व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार ॲड. व्ही.जे. सानप यांनी केले. संचालन पांडुरंग भोयर यांनी केले. यावेळी कार्यक्रमात कायदेविषयक माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले.






