शिवसेनेसोबत युतीची अजिबात इच्छा नाही: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

0
11

शिवसेना-भाजपनं पुन्हा एकत्र यायला हवं आणि त्यासाठी मी स्वत: पुढाकार घेईन, या अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा युतीची चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मात्र आता एकत्र येण्याची इच्छा नसल्याचं सांगत ही चर्चाच निकाली काढली आहे.

ब्राह्मण महासंघाच्या वतीनं पुण्यात झालेल्या सत्कारानंतर विक्रम गोखले यांनी रविवारी मीडियाशी संवाद साधला होता. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढत, शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र यायला हवेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. ‘बाळासाहेबांच्या निधनानंतर राजकारणात जे खेळ चालू आहेत, ते विचित्र स्तरावर पोहचले आहेत. त्यात महाराष्ट्रातील माणूस भरडला जातोय. हे गणित चुकलेलं आहे हे सुधारायचं असेल तर भाजप आणि शिवसेना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. इतरांनीही पुढाकार घ्यावा, असं त्यांनी म्हटलं होतं.

चंद्रकांत पाटील यांनी मात्र युतीची चर्चा फेटाळून लावली आहे. ‘बाळासाहेबांवरचं आमचं प्रेम बेगडी नाही. बाळासाहेबांचं कर्तृत्व आणि श्रद्धेपोटी आमचं त्यांच्यावर प्रेम आहे. शिवसेना-भाजप एकत्र यावी हा त्यामागचा उद्देश नाही. शिवसेनेसोबत एकत्र यायची आमची इच्छा नाही. ज्याप्रमाणे त्यांचा व्यवहार आहे, त्यामुळं तर बिलकूलच नाही,’ असं पाटील म्हणाले.

‘मुंबईत रे रोडला माझं घर आहे. चारही बाजूला मुस्लिम वस्ती आहे. दंगल व्हायची तेव्हा शिवसैनिक आम्हाला १५ – १५ दिवस जवळच्या नारळवाडीमध्ये घेऊन जायचे. ती बाळासाहेबांची शिवसेना आता राहिलेली नाही. त्यामुळं आम्हाला शिवसेनेसोबत सरकार बनवायचं नाही आणि त्यांच्यासोबत निवडणुका लढवायच्या नाहीत,’ असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here