नागपूर दि. 3 : कोरोना विषाणूच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेचा तडाखा बसूनही जिल्हा आता या आघातातून सावरत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी तयार होऊ पाहत असतानाच नागरिकांनी लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट होत आहे. तरी गरोदर माता,स्तनदा माता,तसेच ज्यांचा दुसरा डोस अद्याप घ्यायचा प्रलंबित आहे त्या नागरिकांनी लसीकरण पूर्ण करून घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन क्रीडा व युवक कल्याण पदुम मंत्री सुनिल केदार यांनी केले आहे.
सध्या रुग्ण वाढीचा वेग मंदावला असला तरी कोरोनाच्या संकटाची तीव्रता अद्यापही कायम असल्याचे श्री. केदार म्हणाले. प्रशासन व नागरिकांच्या या सामूहीक प्रयत्नांनी जिल्ह्यात सध्या आश्वासक चित्र असलं तरी सतर्क राहणं गरजेचे आहे. नागरिकांनी या परिस्थितीत कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे. तसेच मास्क वापरण्याची सवय करावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हयात आज 3 सप्टेंबरला 1 नवीन रुग्ण आढळून आला आहे. 41 सद्यस्थितीत सक्रीय रूग्ण आहे. तर 4 रुग्ण् बरे झाले आहेत. 4 लाख 82 हजार 883 रूग्ण आतापावेतो बरे झाले असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.94 टक्के आहे.
उत्सवप्रियता टाळून गौरी गणपती या सणासुदीच्या काळात नागरिकांनी कोविड सुरक्षा नियमांचे पालन करावे. मास्क, सुरक्षीत अंतर व हात धुणे या त्रिसूत्रीला जीवनशैली करावी लागेल. यासोबत लसीकरणाद्वारेच कोरोनाला हरवता येईल, असेही त्यांनी सांगितले.
कालपर्यंत शहरात 12 लाख 8 हजार 987 नागरिकांनी पहिला डोस तर 5 लाख 10 हजार 810 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण 17 लाख 19 हजार 797 नागरिकांनी लसीकरण केले आहे. असल्याचं चित्र काही भागांत दिसत असतानाच दुसरीकडे लस घेत कोरोनाविरोधातील लढ्यात नागरिकांचे योगदान उल्लेखनीय कामगिरी बजावतांना दिसत आहे.
जिल्ह्यातील 13 तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राव्दारे लसीकरण मोठय प्रमाणावर सुरू असून कालपर्यंत भिवापूर- 53 हजार 239, हिंगणा- 1 लाख 44 हजार 138, कळमेश्वर- 90 हजार 593, कामठी- 1 लाख 38 हजार 539, काटोल- 99 हजार 579, कुही- 59 हजार 975, मौदा- 76 हजार 882, नागपूर ग्रामीण- 1 लाख 53 हजार 737, नररखेड- 88 हजार 634, पारशिवणी- 85 हजार 13, रामटेक- 69 हजार 518, सावनेर- 1 लाख 38 हजार 660, उमरेड- 1 लाख 30 हजार 42 अशा पध्दतीने एकूण 13 लाख 28 हजार 549 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
स्तनदा माता, अपंगांचे प्राधान्याने लसीकरण
जिल्ह्यातील 45 वर्षांवरील अपंग आणि स्तनदा मातांचे सर्वच केंद्रांवर प्राधान्याने लसीकरण होणार आहे. 160 पेक्षा अधिक केंद्रावर ग्रामीणमध्ये लसीकरण सुरू आहे.दीर्घ आजाराने ग्रस्त नागरिकांनी जवळच्या उपकेंद्रांतून लसीकरण करून घेण्याचे श्री. केदार यांनी सांगितले. लसीकरणाद्वारेच कोरोनाला मात देण्यासाठी कोणताही संकोच, भिती न बाळगता सर्व वयोगटातील नागरिकांनी लस घेण्याचे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.
00000






