• ‘कोरोना’ला रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची घेतली माहिती
वाशिम, दि. ११ : एप्रिल महिन्यात एकाच वेळी ५०९ ऍक्टिव्ह कोरोना बाधित रुग्ण असलेले रिसोड तालुक्यातील गोवर्धन गाव कोरोनामुक्त करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, ११ जून रोजी गोवर्धनचे सरपंच गजानन वानखेडे यांच्याशी दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. तसेच गावामध्ये राबविलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली व गाव कोरोनामुक्त केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पद्मश्री पोपटराव पवार मुख्य सचिव सीताराम कुंटे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब ज-हाड यांच्यासह राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच वाशिम येथून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, पंचायत विभागातील गट विकास अधिकारी एस. जी. कांबळे, तामसीच्या सरपंच ज्योती कव्हर, गोवर्धनचे ग्रामसेवक पी. बी. भालेराव, तामसीचे ग्रामसेवक श्याम बरेटीया आदी उपस्थित होते.
वानखेडे यांनी सांगिलते की, सुमारे ३ हजार ९०० लोकसंख्या असलेल्या गोवर्धन गावामध्ये दुसऱ्या लाटेतील पहिला रुग्ण ३ एप्रिल रोजी सापडला. त्यानंतर हळूहळू रुग्ण संख्या वाढू लागली. जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना गावाला भेटी देवून कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी उपाययोजना सुरु केल्या. यानंतर गाव समितीने गावात घरोघरी जावून सर्व्हे केला. घरोघरी जावून सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करून घेतली. दरम्यान, १५ एप्रिल रोजी ५०९ ऍक्टिव्ह रुग्ण होते. यामध्ये ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत त्यांचे गृह विलगीकरण केले व ज्यांना लक्षणे आहेत त्यांना कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
गावामध्ये कोरोना नियमांचे पालन, पाच ते सहा वेळा गाव निर्जंतुकीकरण केले. गावातील नागरिकांनी सर्व उपाययोजनांना चांगला प्रतिसाद देवून सूचनांचे पालन केले. त्यामुळे गावातील रुग्ण संख्या कमी होत गेली. २६ मे रोजी गावामध्ये शेवटचा कोरोना बाधित सापडला, आता गाव कोरोनामुक्त असल्याचे श्री. वानखेडे सांगितले. तसेच कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेमध्ये गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी सर्व ग्रामस्थांना सोबत घेवून काम करणार आहे. यासाठी कोरोना नियमांचे पालन करण्यासोबतच ४५ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यासाठी ग्रामस्तरीय समितीने पुढाकार घेतला आहे. गावात आतापर्यंत ४५ वर्षांवरील ७७ टक्के लोकांचे लसीकरण झाल्याचे त्यांनी सांगितले.
गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी गाफील न राहता कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.






