सोयाबीन, तुरीच्या उत्पन्नात दीड ते दोनपट वाढ ,जाणून घ्या अमरपट्टा लागवड पद्धत

0
8

कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी

अमरपट्टा लागवड पद्धत

• सोयाबीन, तुरीच्या उत्पन्नात दीड ते दोनपट वाढ

• वाशिम जिल्ह्यातील केशवराव भगत यांची संकल्पना

आपल्या कृषिप्रधान देशात शेतीची उत्पादकता वाढावी यासाठी अनेक संशोधक, शास्त्रज्ञ, अधिकारी आणि शेतकरी नानाविध प्रयोग-संशोधन करीत असतात. मागास असलेल्या वाशीम जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान कमी असताना देखील इथले शेतकरी सोयाबीन आणि तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या बंपर उत्पादनामुळे जिल्ह्याची ओळख सोयाबीन हब म्हणून होऊ लागली आहे. मातीत राबणाऱ्या आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि तूर पिकाचे उत्पादन कसे वाढेल यासाठी काही शेतकरी आपल्या संकल्पनेतून प्रत्यक्ष शेतीत प्रयोग करीत आहे.

वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीरपासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या चांभई येथील प्रयोगशील शेतकरी श्री केशवराव भगत (वय ६७ वर्षे) यांनी सोयाबीन आणि तूर पिकाच्या दीडपट ते दुप्पट वाढीसाठी १० वर्षांपूर्वी अमरपट्टा पद्धत विकसित केली आहे. अमरपट्टा पद्धत म्हणजे कधीही नष्ट न होणारी, नावाप्रमाणेच अमर राहणारी अशी पद्धत. या पद्धतीचे वैशिष्टय म्हणजे कमी बियाणे, कमी मजुरी, कमी पाणी, कमी खतांचा व कीटकनाशकांचा वापर करून जास्तीत जास्त तूर आणि सोयाबीन पिकाची उत्पन्न देणारी ही पद्धत.

भगत यांनी स्वतःच्या संकल्पनेतून दहा वर्षांपूर्वी विकसित केलेल्या या पद्धतीला कृषी विभागाने नाव दिले अमरपट्टा पद्धत. विशेष म्हणजे श्री. भगत यांच्या मोठा मुलाचे नाव देखील अमर आहे. अमरपट्टा पद्धतीचा प्रयोग श्र भगत यांनी दहा वर्षांपूर्वी मोहगव्हाण शिवारात १९९८ मध्ये घेतलेल्या अकरा एकर शेतीपैकी दोन एकर शेतीत केला. विशेष म्हणजे ही जमीन गिट्टीखदानची जागा होती. प्रचंड मेहनत घेऊन ही जमीन त्यांनी विकसित केली. आज ती जमीन बघितल्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही की पूर्वी याठिकाणी गिट्टी खदान होती. आज त्यांची संपूर्ण अकरा एकर शेती ठिबक सिंचनाखाली आहे. शेतात दोन विहिरी आहे. सन २०१८-१९ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेतून ५० लाख लिटर पाणी साठवण क्षमतेचे शेततळे तयार करण्यात आले.

अमरपट्टा पद्धतीने केशवराव भगत यांनी दहा वर्षांपूर्वी दोन एकर शेतात तूर आणि सोयाबीनची लागवड केली. पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरणी करतांना यंत्राची रेंज ३० ची ठेवण्यात आली. एका एकरमध्ये तूर आणि सोयाबीनची पेरणी करतांना एकरी चार किलो तूर आणि अठ्ठावीस किलो सोयाबीन बियाण्याचा वापर केला.

तुरीची लागवड केल्यानंतर तुरीच्या दोन्ही बाजूची अडीच फूट जमीन मोकळी सोडली. त्यानंतर बाजूच्या चार ओळीत सोयाबीन लागवड केली. तुरीच्या दोन्ही बाजूला जागा मोकळी सुटल्याने पेरणीच्यावेळी एकरी चार किलो तूर बियाणे त्यामध्ये दीड किलो डीएपी खत आणि अठ्ठावीस किलो सोयाबीन बियाण्यांचा वापर केला. जमिनीच्या वर रोपे आल्यानंतर तुरीच्या रोपांची विरळणी करण्यात आली. एक फूट अंतरात चार ते पाच रोपे ठेवण्यात आली. एक एकर क्षेत्रात चौदा ते पंधरा हजार रोपे आलीत. ३० दिवसानंतर तूरीच्या झाडांची शेंडे खुडणी करण्यात आली. तुरीच्या दोन्ही बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत एकरी २० किलो याप्रमाणे १०:२६:२६ या खताची मात्रा देण्यात आली. बोराकॉल – १२ या खताची मात्रा तूरीला दिल्यामुळे तूर पीक चांगलेच बहरले. ६० दिवसांनंतर पुन्हा तुरीची शेंडे खुडणी करून तुरीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत एकरी २० किलो प्रमाणे १०:२६:२६ या खताची मात्रा देण्यात आली. कोळपणी करून तेथे पाणी देण्यात आले.

तूर आणखी चांगलीच बहरली. तुरीला पाण्याचा खंड पडू न देता, तुरीच्या ओळीत ओलावा कायम राहील ही काळजी घेण्यात आली. सोयाबीनमध्ये रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. आवश्यक तेव्हा तणनाशके मारण्यात आली. त्यामुळे तणांचे प्रमाण कमी झाले, तर कृषी तज्ञांच्या सल्ल्याने योग्य वेळी तुरीवर कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली. त्यामुळे रोगाचा प्रभाव ५० टक्के कमी झाला. तुरीच्या दोन्ही बाजूला अडीच फूट मोकळी जागा सुटल्यामुळे सोयाबीनला भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा मिळाल्यामुळे सोयाबीनवर बुरशीजन्य रोग कमी झाले. मित्रकीटकांचा व पक्षांचा सोयाबीनमध्ये वावर वाढल्याने ५० टक्के कीटकांचा प्रादुर्भाव कमी झाला. अमरपट्टा पद्धतीने सोयाबीन व तुरीच्या लागवडीतून केशवराव भगत यांना एकरी नऊ क्विंाटल सोयाबीन तर एकरी १३ क्विंटल तुरीचे असे भरघोस उत्पादन घेतले. पूर्वी त्यांना एकरी पाच ते सहा क्विंटल सोयाबीन तर सात ते आठ क्विंटल तुर व्हायची.

केशवराव भगत यांनी अमरपट्टा पद्धतीने केलेली सोयाबीन तुरीची लागवड पाहून काही शेतकऱ्यांनी त्यांना मुर्खात काढले. अशा पद्धतीने कुठे सोयाबीन तुरीची लागवड करतात काय असेही त्यांना अनेक शेतकऱ्यांनी म्हटले. एवढी जागा शेतात कुठे मोकळी सोडतात काय, हा माणूस विचित्र पद्धतीने लागवड करतो असे काही शेतकऱ्यांनी म्हटले. जेव्हा त्यांना सोयाबीन व तुरीचे भरघोस उत्पन्न मिळाले,यावर कुणाचा विश्वासच बसला नाही. केशवराव भगत यांच्या अमरपट्टा पद्धतीने त्यांचे मित्र भाऊराव व्यवहारे यांनी केवळ एक एकर शेतात नऊ वर्षापूर्वी तूर व सोयाबीनची लागवड केली. यामधून त्यांना एकरी १३ क्विंटल सोयाबीन व एकरी १३ क्विंटल तुरीचे उत्पन्न झाले. पूर्वी त्यांना सहा ते सात क्विंटल तूर व सोयाबीन व्हायचे.

त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी केशवराव भगत यांच्या शेतीला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करून तूर व सोयाबीनच्या दीड ते दुप्पट उत्पन्न वाढीची माहिती घेतली.कृषी विभागाच्या मार्गदर्शनात श्री. केशवराव भगत त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन वाशीम, अकोला,बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, जालना, परभणी, हिंगोली व वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकरी मागील काही वर्षापासून तूर आणि सोयाबीनची लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न घेत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तर त्यांच्या संपूर्ण शेतीत तूर व सोयाबीन पिकासाठी अमरपट्टा पद्धतीने लागवड केली आहे. त्या शेतकऱ्यांकडून इतर शेतकरी अमरपट्टा पद्धतीचा अवलंब करू लागले आहेत. अमरपट्टा पद्धतीने शेतकऱ्यांनी केवळ दोन एकर शेतीत सुरुवातीला प्रयोग करावा. त्यानंतर मिळालेल्या उत्पन्नाच्या आधारावर उर्वरित शेती त्या पद्धतीने लागवड करावी. त्यामुळे शेतकरी सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही. असा विश्वास केशवराव भगत यांनी व्यक्त केला.

भगत हे मागील दहा वर्षापासून अनेक गावात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तर काही गावात शेतकऱ्यांच्या बैठकांमध्ये उपस्थित राहून मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल कृषी विभागाने आणि अकोला कृषी विद्यापीठाने त्यांना सन्मानित केले आहे.

एवढेच नव्हे तर  केशवराव भगत यांनी केवळ सोयाबीन आणि तुरीचेच भरपूर उत्पन्न घेतले नाही तर त्यांनी यापूर्वी हिरव्या मिरचीचे एकरी ३०० ते ३५० क्विंटलपर्यंत विक्रमी उत्पादन घेतले. वांगे, कोबी, टमाटर, ढोबळी मिरची, दोडके यांचे सुद्धा विक्रमी उत्पन्न घेतले. आता त्यांनी तूर व सोयाबीन या पिकासह भाजीपाला पिकाचे उत्पन्न घेणे सुरू केले आहे. शेतातच घर असल्यामुळे २४ तास त्यांचे शेतीकडेच लक्ष आहे.मल्चिंग व गादीवाफा पद्धतीने ठिबक सिंचनातून पाण्याची व्यवस्था संपूर्ण शेतीत निर्माण केल्यामुळे कमी पाण्यात, कमी मजुरीत,चांगले मुरलेले खत शेतीत वापरतात. कोरडवाहू शेतीतून सोयाबीन आणि तूर पिकाच्या दीड ते दुप्पट उत्पादनासाठी केशवराव भगत यांनी विकसित केलेली अमरपट्टा पद्धत कृषी क्षेत्रातील क्रांतीसाठी महत्वाची ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here