विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोकण दौऱ्यावर असताना उदय सामंतांनी रत्नागिरीत जाऊन त्यांनी गुप्तभेट घेत बंद दाराआड चर्चा केली असा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी केला. त्यावर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. निलेश राणे हे खोटं बोलत असून हा निव्वळ बालिशपणा असल्याचा पलटवार उदय सामंत यांनी केला आहे.
सावंत पुढे म्हणाले मला जर गुप्त बैठक करायची असती तर मी रत्नागिरीच्या मतदारसंघात का करेल. असं करायचं असतं तर मी नागपूर, दिल्लीला जाऊन भेटलो असतो. माझ्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे अशा बातम्या पसरवणं हे बालिशपणाचं काम आहे, असा घणाघात उदय सामंत यांनी केला आहे.
ही घटना ६ दिवसांआधी झाली आहे. मी स्वस्त: सिंधुदूर्ग आणि रत्नागिरीच्या दौऱ्यावर होतो. त्यावेळी देवेंद्र फडणवीसही तिथे आले. महाराष्ट्राच्या राजकारणाची एक संस्कृती आहे. त्यामुळे मी त्यांचं स्वागत केलं. मी सदिच्छा दिल्या म्हणून मी पाप केलं असं मला वाटत नाही.’
‘ज्यांनी माझ्यावर टीका केली ते खूप मागे उभे होते. 200 लोकांच्या समोर ही गुप्त बैठक कशी असेल. ही बैठक दरवाजा आड झाली नाही. ज्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत तेसुद्धा माझ्यासमोर बसले होते. आता ते कुठे बसले होते हे मी सांगत नाही. माझं राजकीय अस्तित्व हलवण्यासाठी हे बोलणं योग्य नाही’, असा सणसणीत टोला उदय सामंत यांनी निलेश राणे यांचं नाव न घेता लगावला आहे.
‘राज्यात ऑपरेशन लोट्सची गरज नाही. भविष्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहणार आहे. राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला म्हणून शरद पवार यांच्याशी संबंध तुटले असं नाही. महाविकास आघाडीत तितकाच आदर आम्ही एकमेकांशी करतो’ असंही सामंत म्हणाले.





