प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापासून ते सुप्रिम कोर्टापर्यंत सर्वजण करोना संसर्ग चांगल्या पद्धतीने हाताळल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे कौतुक करत असताना केवळ माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच कसे सारे आभासी दिसत आहे? असा सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, देवेंद्र फडणवीस सगळीकडे राजकारण करत आहेत. त्यांना सर्वत्र राजकारणच दिसत आहे. त्यांना मी यापूर्वीच सांगितले आहे की, नशिबात आहे ते मिळणारच आहे. पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणून काहीही मिळणार नाही. यंत्रणेवर सतत टीका करून त्यांना नाउमेद करू नका. त्यापेक्षा मंत्री गडकरी यांचे अनुकरण करा. भले आम्हाला आमच्या कामाचे श्रेय देऊ नका, पण नाउमेद तरी करू नका, असा खोचक सल्ला मुश्रीफ यांनी फडणवीसांना दिला आहे





