राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे, असे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सर्वात मोठा दिलासा म्हणजे राज्याचा साप्ताहिक सरासरी करोना पॉझिटिव्हिटी रेट २.४४ टक्के इतका खाली आला आहे. त्यात करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कोल्हापूर, रत्नागिरीतून समाधानकारक बातमी आली असून सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील करोना स्थिती अजूनही चिंता वाढवणारी आहे.
कोविड बाबत अहवालात काय म्हटलंय?
१. कोविडची दुसरी लाट: कोविड साथरोग आटोक्यात आणण्यासाठी राज्याने केलेल्या आरोग्यविषयक उपाययोजना व नागरीकांचे सहकार्य याचा परिणाम म्हणून राज्यात दुसरी लाट नियंत्रणात आली आहे.
२. शून्य रुग्ण – नंदूरबार जिल्हयात सध्या एकही कोविड सक्रिय रुग्ण नाही.
३. दहापेक्षा कमी रुग्ण – राज्यातील धुळे, वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया या सहा जिल्ह्यांत सक्रिय रुग्णसंख्या दहापेक्षाही कमी आहे.
४. शंभरपेक्षा कमी रुग्ण – राज्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांत सक्रिय रुग्णसंख्या १०० पेक्षा कमी आहे.
५. सद्यस्थितीत जास्त रुग्णसंख्या असलेल जिल्हे- सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग.
६. राज्याचा साप्ताहिक सरासरी रुग्णबाधेचा दर (Positivity rate) २.४४ टक्के इतका आहे.
७. राज्यात गत काही दिवसात कोल्हापूर, रत्नागिरीतील रुग्णवाढीचा दर हा चिंताजनक होता. तथापि, आजघडीला दिलासादायक बाब म्हणजे या जिल्ह्यांचा साप्ताहिक सरासरी रुग्णवाढीचा दर २.४४ टक्के यापेक्षाही कमी आलेला आहे.






