भारतातील TCS आणि Infosys या दोन आघाडीच्या कंपन्यांनी लॉकडाऊनच्या काळातही मेगाभरतीचा प्लॅन आखला आहे. यापैकी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS मध्ये तब्बल 40 हजार पदांसाठी भरती सुरु होणार आहे. गेल्यावर्षीही कंपनीने एवढ्याच लोकांची भरती केली होती.
गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत TCS ला जबरदस्त नफा झाला होता. आगामी काळासाठीही कंपनीला अनेक प्रोजेक्टस मिळाली आहेत. त्यासाठी TCS कडून 40 हजार पदे भरली जाणार आहेत. टीसीएस बाजारपेठ आणि कॅम्पस इंटरव्ह्यू अशा दोन प्रकारांनी कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.
इन्फोसिस कंपनीत 26 हजार पदांची भरती
भारताची दुसर्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिस 2021-22 या आर्थिक वर्षात कॅम्पसमधून 26000 फ्रेशर्सना नोकरी देणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा एट्रिशन रेट 15 टक्के होता (attrition/कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्याचा दर). जुलै 2021 पासून कंपनीने सेकंड परफॉर्मेन्स रिव्ह्यूला सुरुवात करणार आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव यांनी ही माहिती दिलीय. मागणी वाढत असताना एट्रिशन रेटमध्ये वाढ झाल्यामुळे नव्या पदांची भरती करण्यात येणार असल्याचे Infosys कडून सांगण्यात आले.
26 हजार नोकरदारांपैकी भारतीय कॉलेजमधून 24 हजार तरुणांना नोकरी देण्यात येणार आहे. तर एक हजार कर्मचारी हे फ्रेशर्स असतील. याशिवाय, परदेशातही काही कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. 2020-21 मध्ये इन्फोसिस कंपनीने कॅम्पस इंटरव्ह्यूजच्या माध्यमातून 19 हजार जणांची भरती केली होती.






