वर्धा :जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आज रात्रीपासून जिल्ह्यात 36 तासांची कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
वर्धा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करताना विकेंडला 36 तास संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. शनिवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे.
काय बंद राहणार?
संचारबंदीच्या कालावधीत वैद्यकीय सेवा वगळता दुकाने, मॉल्स, मार्केट बंद राहतील. या काळात हॉटेल्स, रेस्टॉरंट, ट्रॅव्हल्स, खासगी परिवहन सेवा, एसटी, ऑटोरिक्षा सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरू राहील. दूध डेअरी पहाटे 6 ते सकाळी 10 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहील.
एमआयडीसीतील आस्थापनाही सुरू ठेवण्यात येणार आहे. पेट्रोल पंपदेखील बंद राहणार आहेत, अशी माहिती देशभ्रतार यांनी दिली. तसेच कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी या संचारबंदीला सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.






