नागपूर दिनांक 08 सप्टेंबर ( महानगर प्रतिनिधी )
पीक कर्ज, मुख्यमंत्री रोजगार योजना, बचत गट, महामंडळाकडे असणाऱ्या विविध योजना या सगळ्यांमध्ये शेतकरी व त्याचा परिवार हाच लाभार्थी असतो. आपण सर्व देखील शेतकऱ्यांचीच मुले आहोत. त्यामुळे मानवीय दृष्टिकोन ठेवून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सर्व बँक अधिकाऱ्यांना केले.
जिल्ह्यातील सर्व बँक प्रतिनिधींची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती सभागृहामध्ये घेण्यात आली होती. या बैठकीला शिखर बँकेचे अध्यक्ष गेडाम तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, विविध शासकीय महामंडळाचे प्रतिनिधी, राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी पीक कर्ज, मुख्यमंत्री रोजगार योजना, प्रधानमंत्री रोजगार योजना, कृषी विभागाच्या विविध योजना, कौशल्य विकास विभागाच्या विविध योजना, बचत गटांचे कर्जवाटप याबाबतचा आढावा घेण्यात आला.
सामान्य माणसाच्या खात्यात थेट पैसा जावा यासाठी शेतकऱ्यांच्या आयुष्यात बँकेचे महत्त्व अधिक वाढले आहेत. भ्रष्टाचार विरहित यंत्रणा निर्माण करण्यासाठी बँकांनाही एक संधी आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी तर आता या क्षेत्रामध्ये अधिक मानवीय दृष्टिकोन ठेवून काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कोणताही प्रस्ताव सरळ रद्द न करता त्यातून शेतकऱ्यांना काय देता येईल. तरुणांना पूर्ण नाही मात्र किती रक्कम देता येईल याचा किमान विचार झाला पाहिजे. बँक स्तरावर योग्य प्रकारे लोन घेणाऱ्या तरुणांचे समुपदेशन करणारी यंत्रणा आणखी बळकट करण्याचे त्यांनी सांगितले.
खरीपानंतर आता रब्बीसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज मागितले जाणार आहे. त्या दृष्टीने बँकांनी तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. यानंतर दर महिन्याला प्रत्येक योजनेच्या अनुसार सर्व बँकांच्या कर्ज वितरणाचा आढावा घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.






