महाराष्ट्र दिनांक 15 डिसेंबर( प्रतिनिधी)
राज्यात करोना व्हायरसच्या ओमिक्रॉन (omicron) व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहे. मुंबई, पुणेबरोबरच विदर्भ, मराठवाड्यातही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळत आहेत. ओमिक्रॉनच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लावणार का?, अशी चर्चा आहे. तसंच, नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध कठोर होण्याची शक्यता असतानाच. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या २८वर गेली आहे. उस्मानाबाद, बुलडाण्यातही रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंधाची चर्चा होत आहे. त्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नवीन वर्ष, ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर कोणत्याही निर्बंध नसणार, असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. तसंच, नागरिकांनी फक्त करोनाचे नियम पाळावे व गर्दी टाळावी, असं आवाहन केलं आहे.
आपल्याला कोणत्याही परिस्थितीत करोना नियम पाळावे लागणार आहेत. लसीकरण वाढवावं लागणार असून या पार्श्वभूमीवर आपल्याला काळजी घ्यायची गरज आहे. राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढत असतील तर याचा परिणाम फेब्रुवारीमध्ये पाहायला मिळू शकतो असा टास्क फोर्सचा अंदाज आहे, अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं राज्यात निर्बंध लावायचा कोणताही विचार नाही पण काळजी घ्या, असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे.






