नागपूर दिनांक 15 डिसेंबर (महानगर प्रतिनिधी)
दर वर्षी भव्य स्वरुपात महाराष्ट्राच्या उपराजधानीत मध्य भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन ‘अॅग्रोव्हिजन’ भरवले जाते. मात्र शासन दरबारी नोंदणीकृत असणा-या ॲग्रोव्हिजन फाऊंडेशनचा लोगो आणि बॅनर यांचा अवैधरित्या उपयोग करुन उत्तरप्रदेशातील लखनऊ येथे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले. असे आयोजन करणा-या ‘इंडियन चेंबर ऑफ फूड अॅण्ड अॅग्रिकल्चर’ या संस्थेला दिल्ली उच्च न्यायालयाने चपराक लगावली असून अॅग्रो व्हिजनचा लोगो तसेच बॅनर वापरण्यास या संस्थेला मनाई केली असल्याची माहिती अॅग्रो व्हिजनचे संयोजक रवींद्र बोरटकर व गिरीश गांधी व सल्लागार डॉ. सी. डी. मायी यांनी दिली.
‘इंडियन चेंबर ऑफ फूड अॅण्ड अॅग्रिकल्चर’ या संस्थेतर्फे लखनऊ येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी प्रथम १ ते ३ डिसेंबर दरम्यान हे प्रदर्शन भरवण्यात येणार होते मात्र त्यानंतर १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत लखनऊ येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले, ही बाब लक्षात येताच अॅग्रो व्हिजन फाऊंडेशनने पत्रव्यवहार करुन त्यांचे सर्व दस्तावेज मागविले व त्याची छाननी केली व अॅग्रो व्हिजनचा लोगो तसेच बॅनर न वापरता आपल्या संस्थेच्या बॅनरखाली प्रदर्शन आयोजित करण्यास सांगितले
पण आयसीएफएने याकडे दुर्लक्ष करीत प्रदर्शनाचे आयोजन कायम ठेवले, त्यावर फाऊंडेशनतर्फे आक्षेप घेऊन नोटीस देण्यात आली पण त्याकडे देखील आयोजकांनी दुर्लक्ष केल्यामुळे अखेर दिल्ली उच्चन्यायालयात धाव घेण्यात आली.
प्रदर्शन आयोजनाची तिथी आणि उर्वरित कालावधी लक्षात घेता, यानंतर अॅग्रो व्हिजनचे बॅनर व लोगो वापरण्यास कोर्टाने मनाई केली तसेच सध्या सुरू होणा-या प्रदर्शनाची जाहिरात, प्रचार-प्रसार कोणत्याही माध्यमांद्वारे करु नये, आयोजनाचे व्हीडीओ रेकॉर्डिंग करावे, त्याच्या जमाखर्चाचा हिशेब करावा असे आदेश स्थानिक जिल्हाधिका-यांना दिले.
यासोबतच अॅग्रो व्हिजन बॅनरखाली यानंतर प्रदर्शन आयोजित करता येणार नाही अशी सक्त ताकीद देखील आयसीएफएला कोर्टाने दिली आहे.प्रदर्शन रद्द केल्याने अनेक लहान-मोठे उद्योजकांचे आर्थिक नुकसान होईल,अनेकांच्या रोजगारावर गदा येईल,हा मानवीय दृष्टिकोण लक्षात घेऊन दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रदर्शनावर बंदी आणण्यास टाळले.
तसेही ॲग्रोव्हिजन फाऊंडेशचा लखनऊ मधील या प्रदर्शनाला विरोध नसून फक्त ट्रेडमार्कच्या दुरुपयोगावर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली होती असे बोरटकर यांनी याप्रसंगी सांगितले.गेल्या १२ वर्षांपासून फाऊंडेशनने कृषि प्रदर्शनीसाठी अविरत परिश्रम केले असल्याचे त्यांनी सांगितले.






