उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू होणार असल्याची माहिती दिलीय. विद्यार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस आवश्यक असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय. 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी नियमावली करण्यात आलीय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री आणि सचिव यांची एक बैठक झाली, या बैठकीतच हा निर्णय घेण्यात आलाय. विद्यापीठ महाविद्यालय वर्ग 50% पेक्षा अधिक सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला देण्यात आलेत, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिलीय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
तर महाविद्यालयांनी कॅम्पस घेत लसीकरण करावे
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महाविद्यालय सुरू ठेवायची का हा निर्णय सर्वस्वी स्थानिक प्राधिकरणाला असेल. दोन्ही डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयांनी कॅम्पस घेत लसीकरण करावे, अशा सूचनाही देण्यात आल्यात. विशेष म्हणजे वसतिगृह सुरू करण्याचा आदेशही दिलाय. शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक यांचं लसीकरण पूर्ण झालं पाहिजे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिलीय.
‘स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा’
“तिसरी लाट येणार आहे की नाही ते अद्याप कुणालाच माहिती नाही. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारची नियमावली तयार करण्याची वेळ आली तर विद्यापीठाने त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घ्यावा, असे स्पष्ट मत आम्ही शासन म्हणून घेतलेला आहे. कारण काही अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. तसेच काही ठिकाणी प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे हीच नियमावली लागू करायची की नाही याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. प्रत्येक जिल्ह्यात कदाचित वेगवेगळी नियमावली असू शकते”, असं सामंत म्हणाले.






